Monday, November 9, 2009

पुनर्जन्माचे भय


स्वामी विवेकानंदांच्या शिष्यमालिकेत स्वामी रंगनाथानंदांचे कार्य लक्षवेधी आहे.
त्यांच्या व्याख्यानाच्या मराठी अनुवादाचा हा एक अंश.
रामकॄष्ण मठातर्फे हा प्रकाशित झाला आहे.

भारतात मुक्तीशी दोन कल्पना पुष्कळदा जोडलेल्या दिसतात.
एक म्हणजे जगताविषयी वितॄष्णा किंवा घॄणा आणि पुनर्जन्माचे भय.
सर्वच मुक्तीवादी पंथांमध्ये हे दोन विचार स्पष्टपणे दिसतात.

दुसरा थोड्‌या वेगळ्या स्वरुपात दिसतो. मनुष्याच्या अध्यात्मिक शिक्षणात या दोन कल्पनांना महत्व आहे. फक्त पुष्कळश्या धर्मपंथांनी त्यांना वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले आहे. त्यामुळे त्यांनी धर्मजीवन हे आनंदरहित व उदास बनवले आहे. ईश्वरसानिध्याचा आनंद दुःख आणि दमन यांनी झाकोळून गेलेला आहे. ईश्वरदर्शनाची प्रकाशमय उत्तुंगता बोटावर मोजण्याइतक्या थोर योग्यांनी अनुभवण्याची गोष्ट होवून राहिली आहे.

राबिया ही महान मुसलमान संत होती.
तिला कोणीतरी विचारले, "तुम्ही प्रभूवर प्रेम करता का?"
"होय, करते." ती उत्तरली.
"मग तुम्ही सैतानाचा द्वेष करत नाही काय?" दुसरा प्रश्न आला.
"माझे प्रभूवर इतके प्रेम आहे की सैतानाचा द्वेष करण्यासाठी वेळच मिळत नाही." राबियाने नेमके उत्तर दिले.

"देवा उदासवाण्या संतांपासून आम्हाला वाचव" असे सेंट तेरेसानी म्हटले आहे.

गुरु नानकदेव आणि कितीतरी भारतीय संत अतिशय उत्कट वॄत्तीचे, विनोदी बुद्धीचे, खेळकर आणि हसरे होते.

परंतु जगताविषयी घॄणा आणि पुनर्जन्माविषयीचे भय यांचा मोठा पगडा भारतावर होता हे खरे.
उत्तरकालातील भारतीय वाङ्‍मयात तो जोरकसपणे दिसतो.
धर्माकडे लोक पहातात ते जन्ममॄत्यूच्या चक्रातून सुटका करून घेण्याचे साधन म्हणून.

जीवनाविषयीचे भय, मुक्तीविषयीची आस, पुनर्जन्म न यावा अशी तीव्र इच्छा- यांनी एवढे प्रश्न आणि प्रस्थ माजवले की हे पृथ्वीवरील अल्पकालीन मानवी जीवन , त्यातील प्रश्न, त्याचे भविष्य यांच्या छायेमध्येच त्यांनी आपल्याला झोकून टाकले. त्यातून एक नकारात्मक वॄत्ती उगम पावली.

ती एका जर्मन कवीच्या काव्यपंक्तीत उतरलेली दिसते.
"निद्रा मधूर आहे.
मॄत्यू मधूरतर आहे,
पण मधूरतम गोष्ट म्हणजे जन्मालाच न येणे!"

गेल्या हजार वर्षात या वॄत्तीने भारतीय मनाला पछाडले आहे.
त्यातून अत्यंत व्यक्तीवाद आणि सामाजिक जाणिव यांचा अभाव निर्माण झाला.

त्यामुळॆ मनुष्याचा अध्यात्मिक विकास तर थांबलाच पण ऐहिक विकासालाही खिळ पडली.

परकीय आक्रमणांचि मालिकाच सुरू झाली.
अवाजवी भय हे चारित्र्य जडणघडणीला हानिकारक असते.
त्यामुळे व्यक्तित्व विकासला मर्यादा पडतात; निर्दयता आणि दंभही वाढतात.