Thursday, November 22, 2007

सर्व सोडूनि ह्रदयाकाशी, सद्गुरु शोधावा मायबाप..

परमगुरु ब्रम्हलीन श्री नानामहाराज तराणेकर यांचे ओवीबद्ध चरित्र "मार्तण्ड महिमा" या ग्रंथातून या ओव्या घेतल्या आहेत. ग्रंथरचनाकार श्री विजय पागे, यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना पूज्य श्री नानांच्या मुखातून आलेले हे उपदेशामॄत आहे.


सदबोध संतांचा सेवित अखंडित
जाणावे द्वैतांतले ब्रम्ह प्रकाशित
साधन आराधने समाधीत
भोगावे आपण आनंदाने...

अनुसंधान मात्र नित्य,
असावे साधकाचे आर्त जागॄत,
सावधमने सदा सत्य,
शोधावे पुन्हा, ह्रदयातचि...

न शोधावे गुरुस आपण,
करीत रहावे ठायीच साधन,
घडता विभुतिंचे पथात दर्शन,
घ्यावे मात्र तळमळीने...

खरे सद्गुरु करुणावत्सल,
परिपक्व पहाता साधना सुफल,
कराया धावती शिष्याजवळ,
असे श्रद्धा बलवत्तर जरी..

श्वासोश्वासी घ्यावे,
ह्रदयतालावरी दंग व्हावे,
टाहो फोडोनि हाकारावे,
सदुरुंसी आपल्या उत्कटपणे...

उदरार्थ करणे कर्तव्य नियत,
एरवी एकांती शांत चित्त,
वॄत्ती एकवटोनि जगांत,
खेळते चैतन्य पहावे भावे...

धुंडाळाल जितुके वेदशास्त्रासि,
तितुके पहाल विधीनिषेधासी,
सर्व सोडूनि ह्रदयाकाशी,
सद्गुरु शोधावा मायबाप..

Monday, November 19, 2007

प्रश्नोत्तरे..

संत शब्दांनी आणि अनुभवांनी शरणागत साधकाला समॄद्ध करतात.... अनेक विचारी बुद्धीवंतांना संत सहवास मिळतो. त्यातून ब-याच वेळी अप्रतिम साहित्य जन्माला येते.. असे काही साहित्य येथे सुख-संवाद म्हणून देत आहे..डॉ. शरश्चंद्र कोपर्डेकर यांनी परमपूज्य श्री दत्तमहाराज कवीश्वर यांना विचारलेल्या प्रश्नांनी या मालिकेची सुरुवात करीत आहे.

प्रश्न- महाराज, काही बुद्धीवादी लोक श्रद्धावंत पुरुषाची अंधश्रद्धाळू म्हणून हेटाळणी करतात. तेव्हा काय करावे?

श्री दत्तमहाराज- जोवर भगवंताचे रुप पूर्ण समजून घेतले नाही आणि मनातून विषयांची निवॄत्ती संपूर्ण्पणे झाली नाही, तो पर्यंत श्रद्धा अंधच असते... एक आत्मज्ञानी पुरुषच खरा डॊळस श्रद्धावंत असतो... धर्माचरण करुन ज्याने आपली बुद्धी शुद्ध करुन घेतली आहे आणि संतांच्या वचनांवर पूर्णपणे विश्वास ठेवून त्यातील सिद्धांत ज्याने जाणून घेतले आहेत तोच खरा डोळस.. बाकीचे सर्व अंध श्रद्धाळू असेच म्हटले पाहिजे.


सकाम भक्तिचा पुरस्कार...

प्र. - महाराज, अनेक संतमहात्मे सकाम भक्तिचा पुरस्कार करताना दिसतात. निष्काम भक्तीने जसा भक्ताचा अध्यात्मिक फायदा होतो तसा सकाम भक्तीनेही होतो का?

श्रीदत्तमहाराज- मोक्षाची इच्छा करणारे जीव थोडेच असतात. संसाराची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. अनंत वासना मनामध्ये असल्यामुळे त्यातच मन गुंतते आणि संसार बरा वाटतो. संसारबद्दलच्या सगळ्या कामना मनात उत्पन्न होतात. संतमहात्मे त्यांना सांगतात. ईश्वर सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारा आहे. आपलीही इच्छा ईश्वर पूर्ण करेल.ईश्वरापासून संपत्ती मिळाल्यामुळे, त्या संपत्तीच्या द्वाराने विषयभोग जरी तो घेत राहीला, तरी त्या सकाम भक्तीने दुसरे एक कर्म होते. ते म्हणजे मनातल्या वासना हळूहळू कमी होत जातात. ती सकाम भक्तीच आणखी शुद्ध भक्तीच्या स्वरुपात प्रकट होते. म्हणून ईश्वराची सकाम भक्ती करायला हरकत नाही असे मोठे मोठे शास्त्रकारही मान्य करतात..देवाला विसरून जाउन दुस-या कॊणाकडे जायचं, हात पसरायचा आणि काही मिळायचं नाही..मिळालं तर उपकार मानायचे..यापेक्षा देवाला शरण जाणे कधीही चांगले, सकाम भजन करणे चांगले. इतर कोणाकडे संपत्ती मागण्यापेक्षा ईश्वराकडे मागणे चांगले. त्या संपत्तीमुळे विषय भोगाकडे लक्ष जरी गेलं तरीही ईश्वराच्या कॄपेने मनातल्य़ा वासना कमी होत जातात.नंतर त्यांच्या मनात शुद्ध भक्ती निर्माण होते. पुढे त्यांना पण खरा भक्तियोग प्राप्त होतो..म्हणून संतमहात्मे सकाम भक्तीचा पुरस्कार करतात.सकाम भक्तीचा पुरस्कार केला असला तरी त्याचा मुळ उद्देश हा आहे. (श्री दत्तमहाराज कवीश्वर चरित्र आणि विचारधन या ग्रंथावरून, साभार...)


प्रश्न- महाराज, आम्हाला संसारात राहून कर्मे करावीच लागतात.ती कर्मे करीत असतानाच कर्मबंधनातूनच आम्हाला कसे सुटता येईल?

श्रीदत्तमहाराज- कर्म अज्ञानातून निर्मण झाले आहे. मी हा देह आहे. मी अमक्या कुटुंबात जन्माला आलो आहे. मी अमुक वर्णाचा आहे. माझ्यावर अमुक जबाबदारी आहे. अशी मनाची भुमिका असते. म्हणून कर्मबंधन करणारी कर्मे निर्माण होतात.मी हा देह नाही, मी आहे आत्मा..आत्मा असंग आहे, निर्विकार आहे, सच्चिदानंदघन आहे.मला कसलाच संबंध नाही. एकमेव अद्वितीय आहे..आत्मरुप मी आहे हे ज्ञान झाले आणि या ज्ञानभुमिकेवर जो स्थिर झाला आहे त्याला कर्मबंधन नाही. जोवर मी हा देह आहे हे अज्ञान आहे तोवरच कर्म आहे आणि त्या कर्माचे बंधन आहे.मी देह आहे हे अज्ञान दूर करावयाचे आहे. मी असंग आत्मा आहे याचा अनुभव घ्यावयाचा आहे.मग अज्ञानातून निर्माण झालेले हे कर्म करीत राहिले तर हे अज्ञान जाईल का? अज्ञानातून निर्माण झालेले कर्म अज्ञानाचा नाश करेल का? .. होय.. भांडे मातीने मळलेले असते, ते भांडे स्वच्छ करण्यासाठी मातीचाच वापर करतात.माती योग्य त-हेने वापरली तर ते भांडे मातीच्या योगाने आणखी मलीन होत नाही. उलट ते स्वच्छ होते. तसे अविद्येतून निर्माण झालेले कर्म योग्य तर-हेने केले तर अविद्येचा नाश होण्यासाठी लागणारा मार्ग पुष्कळसा मोकळा होतो.कर्म योग्य त-हेने करणे म्हणजे शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे कर्माचे आचरण करणे.कर्माने अज्ञानाचा नाश होत नाही. पण अज्ञान जाण्यासाठी जे आत्मज्ञान मिळवावे लागते ते कर्म करुनच मिळते.शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण केले की बुद्धीवर संस्कार होतात आणि बुद्धीमध्ये दैवी गुणसंपत्ती निर्माण होते. दैवी शक्ती बुद्धीत निर्माण होते.इंद्रियनिग्रह करणे, विवेक प्राप्त करुन घेणे, वैराग्य मिळवणे यासाठी शास्त्राने सांगितल्याप्रमाणे कर्माचे आचरण करावे लागते.त्यामुळे ज्ञान होते.
कर्म करीत असताना मनात ईश्वराबद्दल भक्ती हवी.ज्ञानयोगाच्या वेळी पण भक्ती हवी, भक्तीयोग हवा.यासाठी भगवंतानी पण कर्मयोगाचा पुरस्कार केला आणि कर्मयोगाचे आचरण केले.बुद्धी शुद्ध झाली. आत्मज्ञान झाले की कर्म करण्याची आवश्यकता रहात नाही.मग लोककल्याणासाठी कर्म केले तरी त्या कर्माचे बंधन होत नाही. म्हणूनच आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा लोकांना धडा घालून देण्यासाठी श्रेष्ठ पुरुष कर्म करीत रहातात. शास्त्र प्रमाण मानून त्याप्रमाणे, कर्माचे आचरण करीत रहातात.
*****************************************************

समाजकार्य करणे

पू. गोळवलकर गुरुजींच्या निधनानंतर श्री गुळवणी महाराजांच्या एका भक्ताबरोबर त्यांचा झालेला संवाद- (सद्गुरु साधक सुसंवाद या ग्रंथावरून साभार)


साधक- महाराज, पू.गोळवलकर गुरुजींचे निधन झाले.

महाराज- होय, फार वाईट झाले. ते असामान्य नेते होते.

साधक- प.पू. गुरुजींनी समाजासाठी सर्वस्व अर्पण केले.
महाराज- काही महापुरुष कार्य करण्यासाठीच जन्माला येतात. ते तसेच होते.


साधक- महाराज, ते कोणत्या ज्ञानभुमिकेवर होते?

महाराज- ते तिस-या, तनुमानसा ज्ञानभुमिकेवर होते. त्यांना कसल्याही भोगवासना नव्हत्या.समाजाचे हित व्हावे ही एकमेव शुभकामना होती. त्यासाठीच ते झटले. साधक- महाराज, त्यांच्यासारखा वैराग्यसंपन्न, बुद्धीमान, शुद्धाचरणी , तपस्वी नेता मी पाहिला नाही. ते फक्त तिस-या ज्ञानभुमिकेवर कसे असतील? मला तर वाटत होते की ते समाधीसिद्ध असतील?महाराज- त्यांनी समाजकार्यापुढे मुक्तीचीही परवा केली नाही.ते सदैव कार्यमग्नच राहिले.साधक- त्यामुळे ते कैवल्य प्राप्त करु शकले नाहीत?महाराज- संस्था चालविणे, समाजकार्य करणे, हीही ज्ञानप्राप्तीला प्रतिबंधच उत्पन्न करते.ध्यानाला बसल्यावर स्वतःला प्रिय वाटणा-या संस्थेचे वा समाजसेवेचे विचार येतच रहातात. ते थांबविता येत नाहीत.म्हणूनच साधकाने संस्था चालविणे, समाजसेवा करणे, वगैरे न करता आधीच ज्ञानप्राप्तीसाठी, मोक्षप्राप्तीसाठीच प्रयत्न केले पाहिजेत.नाहीतर या जन्मात मोक्षप्राप्ती होत नाही. शुभवासना मग त्या कितीही चांगल्या असल्या तरीही, त्या चित्त शुद्ध होऊ देत नाहीत. त्या ज्ञानप्राप्तीला प्रतिबंध निर्माण करतात. म्हणून शुभ आणि अशुभ या सर्व वासनांचा क्षय करावा.
पंडितजी सातवळेकर, आपले साधकच होते. वेदांताची किती थोर सेवा केली त्यांनी! पण त्यांच्या ही मनातून राष्ट्र सुटले नव्हते. परमार्थ अश्यावेळी फार परखड वाटतो. ऐकणारा सुद्धा थक्क होतो.पण परमार्थाएवढे स्पष्ट विचार दुसरीकडे होत नाहीत. म्हणजे ऋषीमुनी,राम, कॄष्ण, संत सत्पुरुष, यांना समाजाबद्धल आत्मीयता कळकळ नव्हती का? त्यांचे समाजकार्य अजरामर झाले. कारण त्यांनी आत्महितानंतर समाजहित केलेले आहे.

श्रीरामकॄष्ण परमहंसाना केशवचंद्र सेन म्हणाले"मला समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटते. मी समाजसेवा व इश्वर लाभाची साधना दोन्ही करीन." त्यावर रामकॄष्ण त्यांना म्हणाले." पहा काली मातेचा दरवाजा संध्याकाळी सात वाजता बंद होतो.एक धनिक त्या वेळी मंदीरापाशी येउन पोहोचला. त्याला मंदिरात जाउन देवीचे दर्शन घ्यायचे आहे. पण! दरवाज्यासमोर दीन दरिद्री भिका-यांच्या रांगा उभ्या आहेत. त्यांची त्या धनिकाला दया आली. त्याला दानधर्म करण्याची इच्छा आहे. अश्या परिसस्थितीत जर तो प्रथम भिका-यांनाच दानधर्म करत बसला तर ठरळ्यावेळी मंदिराचा दरवाजा बंद होऊन जाईल.व त्याला त्या दिवशी देवीचे दर्शन मिळू शकणार नाही.पण तो आधी दानधर्म वगैरे यात वेळ न घालवता, थेट मंदीरात जाऊन मातेचे दर्शन घेईल, मग बाहेर येउन सर्व भिका-यांना दानधर्म करील, तर त्याची दोन्ही कामे त्याच दिवशी पूर्ण होतील".म्हणून प्रथम ईश्वरलाभ करून घेऊन नंतर समाजसेवा वगैरे करणे योग्य. नाहीतर नरदेहाचे मुख्य कार्य जे ईश्वरदर्शन, मोक्षप्राप्ती ते या जन्मात साध्य होणार नाही.ज्ञानप्राप्तीनंतर समाजकार्य करता येते व तेच कार्य समाजाचा खरा उद्धार करू शकते.


आग्रही वॄत्ती

प्रश्न - माझे स्नेही वेगवेगळ्या उपासना मार्गातले आहेत. त्यांचे गुरुही वेगवेगळे आहेत. मधून मधून आमची चर्चा होत असते.परस्परांच्या आग्रही वॄत्तीमुळे मनात जरा नाराजी होते.याला काय करावे?

श्रीगुळवणी महाराज- त्यांनी काय करावे यापेक्षा आपल्याला काय लक्षात ठेवून वागले पाहिजे, याचा विचार करून आपण वागले पाहिजे. पहिले महत्वाचे म्हणजे आपण कोणत्याही संतांना नांवे ठेवू नयेत. कोणाला उपदेश करण्याचा प्रयत्न करू नये. दुसरे असे लक्षात ठेवावे, की स्वतःचे गुरु तेवढे चांगले, श्रेष्ठ आहेत आणि सर्वांनी चांगले म्हटले पाहिजे हा हटटाग्रह नसावा. आपली आपल्या गुरुवरील श्रद्धा मनात ठेवावी.मात्र ती बळकट असावी. दुस-याजवळ त्या श्रद्धेचा उल्लेखही करू नये. (सद्गुरु साधक सुसंवाद या ग्रंथावरून साभार.. )

**************************************

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांच्या परदेशातील वास्तव्यात त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. परंतु या प्रश्नांमध्ये खोचकपणा असायचा. त्यांना स्वामीजींनी तितक्याच हजरजबाबीपणाने उत्तरे दिली.

ख्रिस्ती मिशनरी- स्वामीजी आमचे मिशनरी तुम्हा भारतीयांचे कल्याण करीत आहेत.त्यांना खाउ पिउ घालत आहेत. वस्त्रं देत आहेत. इंग्रजी शिकवत आहेत. आमच्या ख्रिस्ती धर्मानं तुमच्या भारतवासीयांना काय दिले हे सांगू शकाल काय?

स्वामी विवेकानंद- होय. तीन "बी" दिल्या. बायबल. बायोनेट आणि ब्रॅन्डी.

मिशनरी- अपवित्रतेच्या ओतीव मुर्तीच असतात वेश्या. समाजाच्या अमंगलाखेरीज त्यांच्याकरवी काही होणं शक्य आहे काय?

स्वामी विवेकानंद- वेश्यांना पाहून नाकं मुरडू नका. त्याच ढालीप्रमाणे उभ्या राहून, अगणित सतीसाध्वींचं अत्याचारापासून रक्षण करीत आहेत. त्यांना धन्यवाद द्या.त्यांची घॄणा करू नका.हल्लीच माझ्या एका गुरुबंधूचं पत्र आलं आहे.त्यात त्यांनी लिहीलं आहे, की दक्षिणेश्वरी श्रीरामकॄष्णांच्या जन्मोत्सव प्रसंगी शेकडॊ वारांगना दर्शनास येतात. त्याबद्धल एका उच्चभ्रू बंगाली भक्ताचं खडसावून पत्र आलंय. ते लिहीतात, " या बाजारू बायकांच्या गर्दीमुळं बंगाली कुलीन कुटुंबानी दक्षिणेश्वरला जाणं सोडलं आहे". त्यावर माझे ठाम मत आहे, परमेश्वर या संकल्पनेची अभिव्यक्ती मुलतः पापी जनांसाठीच आहे. तथाकथित पुण्यवंतासाठी तितकीशी गरज नाही. जे देवमंदीरात जाऊनही इतरेजनांची जात व व्यवसाय याकडे लक्ष पुरवतात त्यांचे प्रभूवर प्रेम नाही म्हणून ते "सभ्य" मानले जातात असे दिसते. असे सभ्य गॄहस्थ आपल्या ठाकूरांची कदर करू शकणार नाहीत. त्यांची संख्या घटणे आपल्या मिशनसाठी चांगलेच. मी प्रभूचरणी मनःपूर्वक प्रार्थना करतो की शेकडो हजारो, पापी येवोत, वेश्या येवोत, चोर-दरवडेखोर येवोत, आणि श्रीचरणी माथा ठेवोत. मग एकसुद्धा "सभ्य" माणूस आपल्या गुरुदेवांना पाहण्यासाठी दक्षिणेश्वरला आला नाही तरीही हरकत नाही. (योद्धा संन्यासी या ग्रंथावरून साभार)

***********************************

सहज बोलणे हाचि उपदेश

श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे साहित्य जनमानसासमोर आणण्याचे थोर कार्य दोन शिष्योत्तमांनी केले. एक श्री बेलसरे बाबा आणि दुसरे श्री गो. सी. गोखले. श्री गोखले यांनी संपादित केलेल्या "सहज बोलणे हाचि उपदेश" या ग्रंथातून, खालील प्रश्नोत्तरे घेतली आहेत.महाराजांचे शंकासमाधान नेमक्या शब्दांत असे आणि प्रसंगी त्याला उत्तम विनोदाची जोड असायची . वेगवेगळ्या प्रसंगी अनेक भक्तांच्या प्रश्नांना श्री गोंदवलेकर महाराजांनी उत्तरे दिली, त्यांचे संकलन या ग्रंथात आहे.

भक्त- महाराज, आपला अनुग्रह घेतला आहे. आता आमच्यावर कृपा असू द्यावी.

श्रीमहाराज- एका वकीलाने एका गरीब व दिसायला सामान्य असणा-या मुलीशी लग्न केले.रात्री ती रडू लागली आणि म्हणू लागली की तुम्ही माझ्याशी लग्न केले आहे. खरे तर रुप, पैसा, इत्यादि कोणत्याही गुणात मी तुमच्या बरोबरीची नाही.तो वकील म्हणाला- इतके सगळे माहिती असूनही मी तुझ्याशी लग्न केलेच ना? मग आता कशाला दु:ख करतेस?
ही गोष्ट सांगून श्रीमहाराज म्हणाले,"त्या वकीलासारखी माझी अवस्था आहे.मी तुम्हालाही आपले म्हटले आहे. मग निराश होण्याचे कारण काय"?


भक्त- महाराज,माझ्या हातून आपली अशीच सेवा अगदी देहपातापर्यंत घडत रहावी असे वाटते.

श्रीमहाराज- सेवा दोन प्रकारची असते.एक देहाने त्यांची सेवा करणे, त्यांचा कारभार वगैरे पहाणे.ही एकाप्रकारची सेवा झाली.आणि आपले कल्याण करून घेणे ही त्यांचीच "खरी" सेवा आहे.ती आता तुम्ही करा. त्याला वयाचे बंधन नाही.

**********************************

श्वास निश्वासाबरोबर गुरुप्रद नामाचा जप करावा


श्रीदत्तसांप्रदायात पूज्य श्री शंकरपुरुषोत्तमतीर्थ म्हणून महात्मे होवून गेले. त्यांनी हिंदी भाषेत "योगवाणी" या ग्रंथाची रचना केली. साधकाच्या मनात असणा-या अनेक अनुत्तरित प्रश्नांना या पुस्तकाच्या वाचनामुळे उत्तरे मिळतात. या पुस्तकाचे मराठी भाषांतर पूज्य श्री गुळवणी महाराजांनी केले आहे. त्याच ग्रंथातील हा एक प्रश्न आहे.

प्रश्न- गुरुदेव, साधनेस कसे बसावे हे कॄपा करून सांगावे.

उत्तर- हे वत्स! तुमची साधनाच जागॄत म्हणजे प्रत्यक्ष अनुभव देणारी आहे.त्यात इतर आसनादि करण्याची आवश्यकता नाही.ज्या पद्धतीने बसल्यास शरीराला आराम वाटेल तसे बसावे. प्रयत्नपूर्वक पद्मासनादि करण्याची आवश्यकता नाही. साधकास ज्या पद्धतीचे आसन सुखकर वाटेल, त्याच पद्धतीचे आसन ठेवावे.प्रथमतः गुरुमुर्ती उदित झाली की पुढे दिलेल्या मंत्रांनी गुरुदेवांस प्रणाम करावा.

ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमुर्तीं
द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्वमस्यादि लक्ष्यं,
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरुरेव परं ब्रम्ह तस्मैः श्री गुरवे नमः
अखंडमंडलाकारं, व्याप्तं येन चराचरं
तत्पद दर्शित येन तस्मै श्री गुरवे नमः

हे वत्स! श्रीगुरुंनाच निराकार ब्रम्हाचे साकार रुप मानले पाहिजे. श्रीगुरुच आमचे प्रत्यक्ष इश्वर आहेत. एक मात्र गुरुध्यान आणि पूजेने अज्ञाननाशक ज्ञान प्राप्त होते.श्रीगुरुंना प्रणाम करून त्यांचे ध्यान केल्यानंतर गुरुपदेशानुसार "श्वास निश्वासाबरोबर गुरुप्रद नामाचा जप करावा ".साधनेच्या दॄष्टीने हाच पुरुषार्थ आहे. यानंतर ज्या क्रिया व्हावयाच्या आहेत त्या स्वतः होतील. सिद्धीमार्गात आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. "जप कालात अंगप्रत्यंगे जी हालचाल करतील ती त्यांना करू द्यावीत" .त्यात अडथळा आणू नये.प्रतिदिनी श्रद्धा आणि उत्साहाने अशी साधना करावी.तीव्र संवेदनशील साधकास समाधीसिद्धी आणि तिचे फ़ळ लवकरच मिळते.

*****************************************************